Skip to main content

Narendra Modi : प्रोटोकॉलनुसार पंतप्रधानांच्या स्वागतासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री वा उपमुख्यमंत्री का आले नाहीत? मोदींनी जाहीरपणे सांगितलं

Narendra Modi ISRO Visit: बंगळुरुत विमान कधी येणार ते माहिती नव्हतं, म्हणूनच मी मुख्यमंत्री वा उपमुख्यमंत्र्यांनी स्वागतासाठी येऊ नये अशी विनंती केली होती असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं.

बंगळुरु: इस्त्रोच्या चांद्रयान 3 च्या यशानंतर आता मानापानावरून काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये सोशल मीडियावर राजकारण पेटल्याचं दिसून येतंय. प्रोटोकॉल असूनही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमय्या का आले नाहीत असा प्रश्न विचारला जात असून त्यांच्यावर टीकाही सुरू झाली होती. आता त्यावर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच स्पष्टीकरण दिलं आहे. पहाटे विमानतळावर येणार असल्याने एवढ्या लवकर मुख्यमंत्र्यांनी वा उपमुख्यमंत्र्यांनी स्वागतासाठी येऊ नये असं आपण सांगितल्याचं स्पष्टीकरण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलं आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परदेशी दौऱ्यावरून थेट बंगळुरुला आहे. पण त्यांच्या स्वागतासाठी ना कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमय्या उपस्थित होते ना उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार उपस्थित होते. प्रोटोकॉलनुसार या दोघांपैकी एकजण उपस्थित असणं गरजेचं होतं. त्यावरून सोशल मीडियावर भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच जुंपली. पण हा वाद वाढल्यानंतर आता त्यावर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले की, बंगळुरुमध्ये त्यांचे विमान कधी येणार याची माहिती नव्हती. त्यामुळे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांना, राज्यपालांना मी त्रास देऊ इच्छित नव्हतो. त्यामुळेच मी त्यांना आपल्या स्वागतासाठी येऊ नये अशी विनंती केली होती. 

 चांद्रयान 3 च्या यशानंतरक इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन करण्यासाठी शुक्रवारी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमय्या आणि उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी इस्त्रोच्या कार्यालयाला भेट दिली. त्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्त्रोच्या कार्यालयाला भेट दिली. 

मोदींनी राजकारण केलं, काँग्रेसची टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कर्नाटकचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्यपालांनी आपल्या स्वागतासाठी येऊ नये असे सांगितले होते. त्यासाठी त्यांनी आपले विमान बंगळुरूमध्ये कधी येणार याची माहिती नसल्याचं कारण सांगितलं होतं. त्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावरून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं होतं. 

या प्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पद्धतशीरपणे राजकारण केल्याची टीका काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी केली. पंतप्रधान मोदींना कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन करणे कमीपणाचे वाटले असेल. त्यामुळेच त्यांनी या ठिकाणी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री वा उपमुख्यमंत्री येऊ नयेत यासाठी स्वागतासाठी येऊ नये असा संदेश दिला. हे प्रोटोकॉलच्या विरोधात आहे.